शहरात जागोजागी साचले कचर्‍याचे ढिग   

पुणे : कचर्‍यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प बंद असल्याने शहरात जागोजागी कचर्‍याचे ढिग आणि अस्वच्छता दिसत आहे. यामुळे पुण्याची वाटचाल स्वच्छ पुणे, सुंदर पुणे कडून अस्वच्छ पुणे कडे सुरु आहे, अशी टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.हडपसर येथील २०० टन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प गेले तीन आठवडे बंद आहे, धायरी येथील कोरड्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारा ५० टनांचा प्रकल्प गेले एक महिना बंद आहे. सुस येथील २०० टन कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प अर्ध्या क्षमतेने काम करत आहे. याशिवाय वनाज जवळील जुन्या कचरा डेपोमधील रॅम्पची जागा दोन महिन्यांपूर्वी एका संध्याकाळी अचानक मेट्रोला बहाल करण्यात आली आणि कोथरूड, वारजे, कर्वेनगर भागातील दिवसाकाठी गोळा केला जाणारा १२५ मालमोटार कचरा वनाज ऐवजी घोलेरोड, कात्रज येथील रॅम्पवर पाठवायला सुरुवात झाली. त्यामुळे कचरा वाहतुकीचे अंतर तर वाढलेच पण त्या रॅम्पवरील ताण ही वाढला. परिणामी ट्रक खाली होण्यासाठी लागणारा वेळ दुपटीने वाढला आणि ट्रकच्या फेर्‍या निम्म्यावर आल्या. ज्यामुळे कचरा साठून रहू लागला आहे आणि त्यातून कोथरूड, वारजे, कर्वेनगर भागातील कचरा समस्या तीव्र झाली आहे. त्यामुळे पुण्याची वाटचाल अस्वच्छ पुणे, कुरुप पुण्याकडे सुरू झाली आहे.
 
मुळात वनाज येथील रॅम्पला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यापूर्वीच ती जागा मेट्रोला देण्याचा निर्णय कोणी आणि का घेतला, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. पुणेकर मिळकतकर बिलांमध्ये २० टक्के सफाई कर भरूनही घरटी कचरा उचलण्याचे पैसे मोजतात. तेंव्हा स्वच्छ पुणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. फक्त स्वच्छ पाहणी पुरते दिखाऊ काम करुन, भिंती रंगवून शहर स्वच्छ होत नाही, असेही वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 

Related Articles